30.5 C
Latur
Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील मंदिरांतील भाविकांच्या संख्येत घट

राज्यातील मंदिरांतील भाविकांच्या संख्येत घट

औरंगजेब विवादाचा फटका पर्यटकही फिरकेनात!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भद्रा मारुती, गिरिजादेवी मंदिर, सुलीभंजन दत्त मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देवगिरी किल्ल्यावर सहसा गर्दी असते, पण तिथेही लोकांची संख्या खूप रोडावली आहे. ही सर्व पर्यटनस्थळे एकमेकांजवळ आहेत.
दरम्यान, खुलताबाद येथे मुघल बादशाह औरंगजेबाची कबर सध्या वादाचा मुद्दा ठरली असून त्यावरून राज्यात वातावरण अक्षरश: पेटलेले आहे. त्याच मुद्यावरून नागपूरमध्ये हिंसक वातावरण उफाळले, आंदोलकांच्या दगडफेकीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले असून शहरात अनेक ठिकाणी नासधूस झाली.

नागरिकही दहशतीखाली जगत आहेत. खरंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. शिवजयंतीपर्यंत समाधी पाडली नाही तर प्रकरण स्वत:च्या हातात घेऊ, असा इशारा या गटांनी दिला होता. या मुद्यांवरून पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. मात्र या सगळयात हिंदू धार्मिक स्थळे आर्थिक संकटात सापडली आहेत.

या मुद्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या तणावाचा परिणाम मंदिरांवरही झाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भद्रा मारुती, गिरिजादेवी मंदिर, सुलीभंजन दत्त मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देवगिरी किल्ल्यावर सहसा पर्यटकांची बरीच गर्दी असते, पण तिथेही लोकांची संख्या खूप रोडावली आहे. ही सर्व पर्यटनस्थळे एकमेकांजवळच आहेत.

घृष्णेश्वर मंदिर हे तर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे दररोज २०,००० भाविक येतात. आठवड्याच्या शेवटी (वीकेंड) आणि सोमवारी ही संख्या ४० हजारांच्या वर जाते. मात्र, सध्या अशांततेमुळे भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे मंदिर विश्वस्त योगेश टोपरे यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांत मंदिरात फक्त १८ ते २०हजार भाविक आले होते. आणि नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर मात्र ही संख्या आणखीनच घटून ५ हजारांपर्यंत पोहोचली.

भद्रा मारुती मंदिरात भाविकांची संख्या ४० टक्क्यांनी घटली
प्राचीन भद्रा मारुती मंदिर हे शयन मुद्रेतील अनोख्या हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेथेही दररोज सुमारे १५ हजार भाविक येतात, मात्र या वादामुळे भाविकांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती समोर आली आहे. आणि याचा फटका मंदिराच्या आसपासच्या भागातील स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. पूजेचे साहित्य, फुले, प्रसाद आणि धार्मिक स्मरणिका विकणा-यांकडे ७० टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे.

पर्यटनालाही फटका
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ल्याला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भाविक आणि पर्यटकांनी त्यांचा प्रवास रद्द केल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR