मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पूर्वेकडून येणा-या जोरदार वा-यांमुळे, गुरुवारपासून मुंबईसह आसपारच्या परिसरात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही स्थिती आठवडाभर टिकून राहू शकते. अरबी समुद्रात उच्च दाब असल्याने समुद्रावरून येणा-या थंड वा-यांचा वेग मंद राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याच वेळी, आर्द्रता २८ टक्के नोंदवली गेली. कुलाब्याचे तापमान ३३.४ अंश नोंदवले गेले. हवामान ज्या पद्धतीने बदलत आहे, त्यामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मुंबईत तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत पोहोचू शकते, तर ठाण्यात तापमान ४१ अंशांपर्यंत जाऊ शकते. फेब्रुवारीमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचले होते.
सर्वाधिक तापमान ४१.७ अंशांवर
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात मुंबईत सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यात उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. स्वत:ची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. उष्णतेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरा.
फेब्रुवारीमध्येच बसल्या उन्हाच्या झळा
फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळा बसल्या. मुंबईत हंगामाच्या सुरुवातीला सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. पण जोरदार वा-यामुळे उष्णता थोडी कमी झाली. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला.