मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्याबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. पण, महिलांवर जे अत्याचार झाले आहेत, त्यात सर्वाधिक अत्याचार ओळखीच्या व्यक्तींकडून झाले आहेत. अनोळखी व्यक्तींकडून झालेल्या घटनांचे प्रमाण हे ०.४२ टक्के इतके आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही गोष्टींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे, तर विनयभंग आणि बलात्कार. सातत्याने आपण बघितलं तर २०१३ साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण या गुन्ह्यांची व्याख्या बदलली. आपण जर महिलांवरील अत्याचाराच्या संज्ञेमध्ये बघितलं, तर बलात्कारामध्ये आरोपींचे जे वर्गीकरण आहे. याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचे वर्गीकरण किती? तर २०२१ साली ते ९८.७७ टक्के होतं. २०२२ साली ते ९९ टक्के होतं. २०२३ साली ते ९९.४० टक्के होतं आणि २०२४ मध्ये ९९.५८ टक्के आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
एकंदरीत ०.४२ टक्के बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना या अनोळखी व्यक्तींनी केलेल्या आहेत. ९९.५८ टक्के हे ओळखीच्या व्यक्तींकडून झालेले बलात्कार आहेत. जरी या घटनांची नोंदणी वाढत असली, तरी समाजात आता महिला बोलू लागल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
२०१३ पासून बघितले तर एकही वर्ष असे नाही, ज्यात वाढ झाली नाही. दरवर्षी या गुन्ह्यात वाढ आहे, पण ही जी वाढ आहे. ही वाढ एक प्रकारे चिंताजनक असली, तर दुस-या प्रकारे समाधानकारक आहे. कारण यापूर्वी समाजामध्ये या घटनांची नोंद करणे हे एक वाईट मानलं जायचं. समाजाचा दबाव असायचा. समाजाच्या दबावामुळे अनेकवेळा घटना दाखल व्हायच्या नाहीत, असे फडणवीस म्हणाले.