नागपूर : प्रतिनिधी
नागपूर येथे पतंजलीचे नवीन फूड पार्क उघडण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. संत्र्याला चारपट अधिक भाव मिळणार असल्याने शेतकरी मालामाल होतील. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील शेतक-यांनाही याचा लाभ होईल. या पार्कमध्ये संर्त्याचे प्रक्रियाकरण आणि निर्यातही केली जाणार आहे.
दरम्यान, प्रसिद्ध योग गुरू रामदेव बाबा यांच्या फूड पार्कचं आज नागपुरात दणक्यात उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान, नागपूर येथील आशियातील प्रथम आणि देशातील सर्वात मोठे फूड प्रोसेसिंग यूनिट असलेल्या ‘पतंजली फूड व हर्बल पार्क’च्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी योग गुरु स्वामी रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा यांच्या या फूड पार्कचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
वर्कशॉप घेणार
येणा-या काळात संत्रा उत्पादक शेतक-यांच वर्कशोप घेण्यात येणार आहे. रामदेव बाबा आपणास लागणारा संत्रा आम्ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहोत. बांगलादेश सरकार 85 टक्के कर लावत असल्याने निर्यात महाग पडते. बीज आणि फ्लॅगमध्ये बदल होणार नाही तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही. एका एकरमध्ये 30 टन संत्र्याचं उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे, असंही गडकरी म्हणाले.
शेतक-यांना फायदाच होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पावर भाष्य केलं. हा अतिशय मोठा हर्बल प्लांट आहे. आपल्याला आता संत्र्याचं उत्पादन वाढवावं लागेल. बाजारात न विकला जाणारा संत्रा या ठिकाणी विकत घेतला जात असल्यामुळे शेतक-यांना फायदा होणार आहे. इतरही फळांची प्रोसेसिंग इथे होणार आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था केली आहे. असंही फडणवीस म्हणाले.