लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणमध्ये ऑईलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाल्याच्या आणि जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्र दिले जात नसल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेत माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांना दूरध्वनी करून शेतक-यांवर ओढावलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे काही तासात लातूर विभागासाठी तब्बल पाच हजार लिटर ऑईल महावितरणच्या मुंबई कार्यालयाने उपलब्ध करुन दिले.
उन्हाळा सुरु असल्यामुळे ठिकठिकाणच्या रोहित्रावरील भार वाढला आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे, जळण्याचे प्रमाण वाढत आहे. पण लातूरात ऑईलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्रही दिले जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली. शिवाय, महावितरणचे मुंबई येथील मुख्य अभियंता प्रवीण सरदेसाई यांना दूरध्वनीही केला.
माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्याकडून शेतक-यांची व्यथा समजून घेऊन सरदेसाई यांनी काही तासात रोहित्र दुरुस्तीसाठी ५ हजार लिटर ऑइल उपलब्ध करुन दिले. याबाबतचे पत्रही त्यांनी पाठवले. माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुरावामुळे कोळपा, रामेगाव, लखमापूर, टाकळी, भातखेडा या गावांसह लातूर ग्रामीण मधील जवळपास ४० गावातील रखडलेल्या रोहित्र दुरुस्तीचे आणि विद्युत पुरवठा पूर्ववत होण्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिकांना आणि पशुधनाला पाणी मिळणार असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण मधील अनेक शेतक-यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले. मुबलक प्रमाणात ऑईल उपलब्ध झाल्याने आता लातूरमधील महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांनी रोहित्र दुरुस्तीचे काम जलद गतीने करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा माजी आमदार धरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.