लातूर : प्रतिनिधी
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच लातूर जिल्ह्यातील ‘लाडकी बहिण’योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आह. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांमुळे जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ९१ महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता मिळालेला नाही. यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ई-केवायसी करताना महिलांनी अर्जातील ‘सरकारी नोकरदार आहात का?’ या पर्यायासमोर चुकून ‘होय’, असे उत्तर निवडले आहे. नियमानूसार सरकारी नोकरी असलेल्या कुटूंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या महिलांचे मानधन थांबले आहे. आता या त्रुटी दुर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, यामुळे अंगणवाडी सेविकांवर कामाचा प्रचंड ताण वाढला असून त्यांना लाभार्थी महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन किंवा इतर पेन्शन योजनांचा लाभ घेत असल्यामुळे ४४,७७२ अर्ज यापूर्वीच बाद झाले आहेत. आता उर्वरीत ६१ हजार महिलांची पात्रता तपासणीसाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करावी लागणार आहे. एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकेडे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाल्याची भीती, यामुळे या योजनेच्या भवितव्याबाबत महिलांमध्ये संंभ्रमाचे वातावरण आ.े ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत होती.
त्यामुळे ज्या महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नाही अथवा चुकीचे झाले आहे, अशा महिलांच्या खात्यावर योजनेचा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता जमा झालेला नाही. आता या अपात्र ठरलेल्या महिलांच्या घरी शासकीय नोकरदार आहेत का, त्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा कमी आहे का?, इतर लाभ त्या कुटूंबातील महिलांना मिळातो का, याची तपासणी केली जात आहे.

