लातूर : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी लातूर जिल्हा परिषदेला २०२२-२३ साठी राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार २७ मे रोजी मुंबईतील यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण मंत्रालयात आयोजित गौरव समारंभात प्रदान करण्यात आला.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी आणि उपमुख्य कार्यकरी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी पुरस्कार स्वीकारला. २०२३-२४ साठी विभागस्तरावर लातूर पंचायत समितीला प्रथम क्रमांक, तर औसा पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला. यासाठी गटविकास अधिकारी तुकाराम भालके आणि युवराज म्हेत्रे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच २०२२-२३ साठी नरेंद्रसिंह भिमसिंह चौहान आणि २०२३-२४ साठी विश्वास कुंभकर्ण यांना गुणवंत कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.