लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याला मे महिन्यातील बेमोसमी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. शेतीचे अतोनात नुकसान झाले. वीजा पडून जीवित हानीही झाली. जून महिना सुरु झाला. त्यामुळे आता वादळ शांत होईल, असे वाटत असतानाच रविवारी रात्री वादळाने लातूर शहर व परिसरात तडाखा दिला. या वादळाने लातूर शहरातील गांधी चौकातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारतील जुने मोठे झाड एका कारवर कोसळले. वादळी तडाख्यात वीज पुरवठा खंडीत होवून लातूर शहर अंधारात बुडाले होते. भयभीत करणारी रविवारची रात्र होती.
मे महिन्यातील सुमारे २० ते २२ दिवस लातूर जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा मुक्काम होता. दररोज वादळी पाऊस पडत राहिला. या पावसामुळे शेतीचे विशेषत: फळपिकांचे मोठे नूकसान झाले. कांदा, टरबुजाची शेती नष्ट झाली. विजा पडून जीवित हानी झाली. जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याचा होता. पण, जुनची ९ तारीख गेली तरीही जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरुच आहे. दरम्यान दि. १२ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
लातूर शहर व परिसरात रविवारी सायंकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पाऊस पडल्यानंतर पाऊस थांबला. मात्र विजांचा कडकडाट सुरु होता. रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वा-यास सुरुवात झाली. आकाशात ढगांची गर्दी होती. कधीही जोरदार पाऊस पडेल अशी परिस्थिती होती. परंतू, पावसाची रिमझीम सुरु झाली. वादळी वा-याची गती आणखी वाढली.
या वादळाने शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारातील जुने मोठे झाड पोलीस ठाण्याच्या समोरील मुख्य रस्त्याच्या दिशेने कोसळले. झाड कोळल्याने पोलीस ठाण्याची संरक्षण भितही पडली. हे झाड एमएच २४, एएफ ०४२१ या क्रमांकाच्या कारवर कोसळल्याने कारचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापनाची टिम घटनास्थळी पोहोंचली आणि कोसळलेले झाड कट करुन रस्ता मोकळा करण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे उन्मळून पडली. वादळाने वीज वाहिन्यांवर झाडं कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. अख्ख शहर अंधारात बुडाले होते. रविवारची रात्र भयानक आणि भितीदायक ठरली.