लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी येणा-या काळात लातूर शहराला विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर@४७ या संकल्पनेच्या माध्यमातून लातूर शहर २०४७ मध्ये कसे असेल यासाठी शहरातील तज्ज्ञांच्या समितीतून प्रस्तावित आदर्श आराखडा करण्यात आला आहे. यात सुरक्षा, व्यापार (मार्केट यार्ड) व्यापार (सामान्य), उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, पाणी, महिला, सांस्कृतिक व जेष्ठ नागरिक या १२ विषयांचे सादरीकरण होणार आहे.
या आराखड्याचे सादरीकरण आमदार अमित देशमुख, खासदार सुधाकर शृंगारे व प्रशासकीय अधिकारी तसेच लातूर महानगरातील जाणकार नागरिकांच्या उपस्थितीत दिनांक १० मार्च रोजी सकाळी १० वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. लातूर वैभवशाली होण्यासाठी लातूरकरांच्या लेखी सूचना स्विकारल्या जाणार आहेत. लातूरचा भविष्यकाळ उज्वल व्हावा यासाठी जागृत लातूरकरांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती नोंदवावी व विधायक सूचना कळवाव्यात, असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष अॅड. संजय पांडे, कार्यवाह प्रदीप ननंदकर यांनी केले आहे.