संसद भवनातील सर्वपक्षीय बैठकीत कॉंग्रेसची मागणी
बिहारला विशेष दर्जा द्या : नितीशकुमार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पापूर्वी संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत भाजपसह ४४ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. विरोधी पक्षाकडून काँग्रेस, आप, एआयएमआयएम, वायएसआरसीपी आणि इतर पक्ष सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसने लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी केली. नीट विषयावर लोकसभेत चर्चा व्हावी, अशीही मागणी केली तर नितीशकुमार यांच्या जेडीयूने बिहारला विशेष दर्जा देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत.
या बैठकीत एनडीए किंगमेकर नितीशकुमार यांनी पत्ता खोलला. यावेळी जेडीयूने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली तर आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपीनेही आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. मात्र, टीडीपीने या मुद्यावर काहीच भाष्य केले नाही. या बैठकीला ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी आला नाही. पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून कोलकाता येथे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले.
सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आमच्यात उपयुक्त चर्चा झाली. चांगल्या सूचना देणा-या सर्व पक्षांच्या नेत्यांचे मी आभार मानू इच्छितो. सरकार विहित नियमांचे पालन करून संसदेत कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.
तिस-या कार्यकाळातील
उद्या पहिला अर्थसंकल्प
२२ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तिस-यांदा केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील, त्यानंतर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. कारण या अधिवेशनादरम्यान नीट पेपर लीक, अग्नीवीर, बेरोजगारी, रेल्वे अपघात, यूपीएससीच्या मुद्यावरून अधिवेशन गाजणार आहे.