25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेत गदारोळ

लोकसभेत गदारोळ

हिंदूंच्या नावाखाली हिंसा पसरवली, राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या वक्तव्यावरून आज जोरदार गदारोळ झाला. भगवान शंकरांनी डरो मत, डराओ मत ही शिकवण दिली. परंतु जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत पसरवतात. त्यामुळे ते हिंदू असूच शकत नाहीत. हिंदू धर्मात सत्याची साथ द्या, असे म्हटलेले आहे, असे राहुल गांधी म्हणताच भाजप नेते आक्रमक झाले. तसेच या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीही आक्षेप घेतला. त्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.

राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संविधान हातात पकडून बोलण्यास सुरूवात केली. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करीत खोटे खटले चालवल्याचा आरोप केला. ईडी चौकशीचाही उल्लेख केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असे म्हटले. तसेच भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि अहिंसेचे प्रतिक असलेले त्रिशुल जमिनीत रोवतात आणि स्वत:ला स्वत:ला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात. तुम्ही हिंसा, नफरत पसरविण्याचे काम केले. त्यामुळे तुम्ही हिंदू असूच शकत नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि हे प्रकरण गंभीर असून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर असल्याचे म्हटले.

मोदी, भाजप म्हणजे
हिंदू समाज नाही
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असे म्हटले. यानंतर अमित शाह यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी माफी मागितली पाहिजे. कोट्यवधी लोक स्वत:ला अभिमानाने हिंदू म्हणतात, असे अमित शाह म्हणाले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR