रायगड : प्रतिनिधी
राज्यामध्ये कबरी आणि स्मारकावरुन वाद उफाळले आहेत. औरंगजेबाची कबर यानंतर आता वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये इतिहासातील काही समाधी आणि कबरीवरुन आता वातावरण तापले आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ऐरणीवर असताना वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीला कोणताही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नसून अगदी काही वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अशा पद्धतीची कुर्त्याची समाधी असणे यावर आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहिले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुर्त्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुर्त्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणा-या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुर्त्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.