22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसंपादकीय विशेषविवाहसंस्थेची अनिवार्यता

विवाहसंस्थेची अनिवार्यता

परस्पर संबंध विकसित करताना व्यक्तिगत प्राधान्यांना दिल्या जाणा-या अवास्तव महत्त्वामुळे एकार्थाने विवाह संस्था अडचणीत आली आहे. परंतु विवाह हा खरोखरच व्यक्तिगत स्वातंत्र्य, आशा-आकांक्षांमधील मोठी अडचण आहे का? विवाह ही एक सामाजिक गरज आहे का? विवाहापासून मुक्ती ही लिंग समानता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित राखते का? असे प्रश्न विचारले जात आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी डॉली राणी विरुद्ध मनीष कुमार चंचल या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह अधिनियम कायद्यानुसार विवाह संस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.

काही दिवसांपूर्वी डॉली राणी विरुद्ध मनीष कुमार चंचल या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह अधिनियम कायद्यानुसार विवाह संस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना तसेच न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हिंदू विवाहाचे पावित्र्य सांगत तो एक संस्कार असून पती-पत्नी यांच्यातील परस्परांविषयी सन्मान आणि सहकार्यावर आधारित एका कुटुंबाची पायाभरणी असल्याचे मत मांडले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. भारतीय समाजात या संस्काराची महान मूल्याच्या रूपातून नोंदणी करायला हवी. विवाह हा काही व्यापारी करार नाही. तो एक पवित्र सोहळा आहे आणि एक पुरुष आणि महिला यांच्यातील नैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी साजरा केला जाते. हे संबंध भविष्यात आकारास येणा-या कुटुंंबात पती आणि पत्नीचा दर्जा देतात. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. तत्पूर्वी न्यायालय विवाह आणि विवाहसंस्था यासारख्या शब्दांचा वापर अपवादाने करत असे आणि ज्यासाठी विवाहाला प्रजनन आणि कुटुंबाच्या उत्पत्तीशी जोडणे हा एकप्रकारे प्रतिगामी, बुरसटलेला विचार म्हणून वाटत होते. अशावेळी विवाहावरून पावित्र्य आणि स्थैर्याचा मुद्दा मांडणे हे तथाकथित व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या विचारसरणीच्या अगदी उलट आणि अमान्य असल्याचे समजले गेले.

अनेक दशकांपासून विवाहाच्या अनिवार्यतेला आरोपीच्या पिंज-यात उभे केले गेले आहे. मानसशास्त्रीयांनी त्यास एक सांस्कृतिक सार्वभौमत्वाच्या रुपाने मान्य केले आणि जगात मानवजात जेव्हापासून अस्तित्वात आली, तेव्हापासून ती विविध रुपांत राहिली आहे. विचारवंत मसोनियस यांनी आपल्या व्याख्यानात विवाहाबाबत बरेच काही सांगितले आहे. त्यात जोडप्यांना व्यक्तिगत पातळीवर मिळणारे समाधान, कुटुंबाचे ध्येय (प्रजननाबरोबरच स्नेह आणि सहवास) आणि समाजावर असणारा त्याच्या परिणामाचा समावेश आहे. मुसोनियस म्हणतात, विचारसरणी कोणतीही असो ती लोकांना विवाहसंस्थेपासून दूर नेत असेल तर तो विचार कुटुंब आणि देशच नाही तर संपूर्ण मानवजातीला नष्ट करतो. कदाचित मानवजातीचा विकास आणि संस्थेचे अस्तित्व यावरची चर्चा ही सध्याच्या पिढीसाठी हास्यास्पद विषय राहू शकतो. त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे काय असेल तर स्वहित. म्हणूनच ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ कडे विवाहाला एक पर्याय म्हणून गृहित धरत आहेत. त्यांच्यासाठी विवाह ही एक केवळ किचकट प्रक्रिया नाही तर अकारण ओझे वाटते. दुर्दैवाची बाब म्हणजे विवाह सोहळा हा तरुणांसाठी प्रापंचिक प्रथेपेक्षा तुलनेने स्तोम वाटतो.

परस्पर संबंध विकसित करताना व्यक्तिगत प्राधान्यांना दिल्या जाणा-या अवास्तव महत्त्वामुळे एकार्थाने विवाह संस्था अडचणीत आली आहे. परंतु विवाह हा खरोखरच व्यक्तिगत स्वातंत्र्य, आशा-आकांक्षांमधील मोठी अडचण आहे का? विवाह ही एक सामाजिक गरज आहे का? विवाहापासून मुक्ती ही लिंग समानता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित राखते का? या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘द केस फॉर मॅरेज’ या पुस्तकात सापडते. लिंडा वेट तसेच मॅगी गेलावर यांनी पुस्तकात म्हटले, की व्यक्तिगत हित हे सर्वसमावेशक हित आणि सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षेत परावर्तित होते, तेव्हा आयुष्य अधिक सुलभ आणि सहज होते. लिंडा आणि मॅगी यांनी अनेक संशोधन आणि शास्त्रीय सिद्धांतांना आपल्या तर्काच्या आधारे मांडले आहे. तरुण पिढी ही विवाहाकडे संबंधांचा अकारण दबाव आणि ओझे म्हणून पाहते. सध्याच्या काळात महिलावर्ग शिक्षित आणि आत्मनिर्भर होत असताना, अशा विचारांना अधिक बळ मिळत आहे.

विवाहाच्या उत्पत्तीचा आधार म्हणून प्रजनन हा एक मोठा घटक असताना पित्तृसत्ताक व्यवस्थेत महिलांची आर्थिक जाबाबदारी हे पुरुषांचे आद्य कर्तव्य मानले गेले आहे. परंतु गेल्या काही दशकांत विवाहासाठी आवश्यक असणा-या या मूलभूत समीकरणात बदल झाला आहे. महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत आणि या आर्थिक गरजा स्वत:च पूर्ण करण्यास त्या खंबीर राहत आहेत. शेवटी त्या विवाहाला एका पर्यायाच्या रुपातून पाहत आहेत. परंतु विवाहाच्या गरजेकडे केवळ आर्थिक गरजेतून पाहणे किंवा प्रजननापुरतीच मर्यादित ठेवणे योग्य आहे का? विवाह संस्थांची व्याप्ती ही त्यापुढची आहे. मानसिक आणि आत्मिक समाधान देणारी ती एक व्यवस्था आहे. त्यामुळे मानसिक स्थैर्य आणि आधार हा सहजीवनातून मिळू शकतो. पण सहजीवन संबंधातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यातील अस्थैर्य. स्टॅटेटिक्स तज्ज्ञ बर्नार्ड कोहेन आणि आय सिंग ली यांनी मृत्यूसाठी कारणीभूत ठरणा-या काही घटकांची यादी तयार केली आहे. यात अविवाहित असणे ही सर्वांत मोठ्या जोखमीपैकी एक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक उदाहरण दिले आहे. हृदयविकार झाल्याने एका व्यक्तीचे आयुष्य जवळपास सहा वर्षे कमी होते. तर अविवाहित राहिल्याने एका व्यक्तीचे आयुष्य सुमारे दहा वर्षे कमी होते. पश्चिम संस्कृतीला डोक्यावर घेणारी तरुण पिढी विवाह संस्थेला परंपरेच्या रुपातून पाहत आहे आणि ही बाब त्यांच्या व्यक्तिगत विकासाला बाधक वाटत आहे.

‘गॅलप’च्या संशोधकांनी २००९ ते २०२३ या काळात मध्य अमेरिकेतील सुमारे २५ लाखांहून अधिक पुरुषांना आयुष्य चांगल्या रीतीने व्यतित करण्यासाठी प्राधान्यक्रमांची निवड करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी विवाहाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे विवाह संस्था ही स्थैर्य देण्याबरोबरच मानसिक आणि आत्मिक समाधान प्रदान करते आणि आयुष्यातील सर्व अडचणी पार करण्यास मदत करते. आधुनिक होण्याचा अर्थ सत्यापासून पळ काढणे कदापि नाही. विवाह संस्था संबंधांना स्थैर्य, सुरक्षा आणि समाधान प्रदान करते आणि या गोष्टी अर्थातच चांगल्या आयुष्याचा पाया आहेत.

-डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्त्राच्या अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR