बदायूं : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधून प्रेमाच्या ब-याच बातम्या आल्या आहेत. एका ठिकाणी सासू मुलीच्या लग्नाआधीच जावयासोबत फरार झाल्याची बातमी समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी मुस्कान नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या सहकार्याने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील बदायूंमधून नातेसंबंधांना लाज आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ममता नावाची एक महिला तिच्या मुलीचा सासरा शैलेंद्र ऊर्फ बिल्लूसोबत घरातून पळून गेली. दोघेही टेम्पोतून पळून गेले.
ममताचा पती सुनील कुमार हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे, तो नेहमी लांबच्या प्रवासाला जातो. या दरम्यानच ही विचित्र प्रेमकहाणी सुरू झाली. दरम्यान, ममताची तिच्या मुलीचे सासरे शैलेंद्र यांच्याशी जवळीक वाढली. सुनील म्हणाला, ‘मी महिन्यातून एक-दोनदा घरी येतो आणि वेळेवर पैसेही पाठवतो. पण माझी पत्नी ममता त्याच्यासोबत पळून गेली आहे, घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेली आहे.
ममताचा मुलगा सचिननेही या प्रकरणी खुलासा केला आहे. सचिन म्हणाला, पप्पा घरी राहत नव्हते, मम्मी दर तिस-या दिवशी त्यांना फोन करायची. आम्हाला दुस-या खोलीत पाठवायची. आता ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. शेजारी अवधेश कुमार म्हणाले की, शैलेंद्र अनेकदा रात्री १२ वाजता यायचा आणि सकाळी निघून जायचा. तो नातेवाईक असल्याने परिसरातील लोकांना काहीही संशय आला नाही. पण आता सत्य सर्वांसमोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात सुनील कुमार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर पोलिस म्हणाले, ‘एका महिलेविरुद्ध तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.’