मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर रेड्याचा बळी दिला होता. आणि त्याची शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या आवारात पुरल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. आता राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ या ‘सामना’तील सदरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती, असे म्हटले आहे.
आज फडणवीस ‘वर्षा’वर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘वर्षा’ परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्कॅनिंग करून घेतले. या शोध मोहिमेत तेथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? हा पहिला प्रश्न व फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले काय? हा दुसरा प्रश्न’, असे राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
संजय राऊतांनी सांगितले की, ते कामाख्या मंदिरात गेले होते तेव्हा तेथील पांडा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधून जे आले होते त्यांनी बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील १८ जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली. या शिंगांना ‘सिंदूर’ लावून ती मंतरली जातात व ईप्सित स्थळी खोल पुरून पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावले जाते.
मुंबई-महाराष्ट्रात ही शिंगे आणली गेली. ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कोठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असे मी लिहिले तेव्हा खळबळ उडाली. मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये
अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र. संत गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी या लढाया लढल्या. नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावे लागले. त्या महाराष्ट्रात शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचे पेव फुटले आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली. त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व ते बळी देण्यासाठी रांगेत उभे राहू लागले, असे राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.