लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात पडणा-या पावसाचे पाणी शेतात मुरवून पाणी पातळी वाढवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जलतारा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांना रोजगाराच्या बरोबरच आपल्या शिवारात पाणी मुरवण्याची संधीही मिळणार आहे. जलतारा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हयातील ७०१ शेतक-यांनी रोहयोकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
प्रत्येक शेतक-यांच्या शेतात पाणी ही संकल्पना राबविण्याकरिता शेतक-यांना शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराचे ठिकाण शोधून जलतारा तयार करायचा आहे. आपल्या घरातील पाणी ज्या प्रमाणे शोषखड्यामध्ये जिरवता येते, त्याच प्रमाणे आपल्या शेतातील पाणी आपल्याच शेतात जिरवण्यासाठी जलतारा उपयोग मोलाचा ठरणार आहे.शेतामध्ये एकच वेळेस जास्त पाऊस झाल्यास पाणी साचुन राहत नाही. त्याने शेतातील पिकाची उत्पादकता वाढते. तसेच शेतजमीन चिबड होत नाही. ग्रामीण भागातील शेतक-यांना व कामगारांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या व जलताराच्या माध्यमातून रोजगारही मिळणार आहे. तसेच शेतक-यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.