लातूर : प्रतिनिधी
लातूरात ऑईलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्रही दिले जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने शेतक-यांना रोहित्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली.
उन्हाळा सुरु असल्यामुळे ठिकठिकाणच्या रोहित्रावरील भार वाढला आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे, जळण्याचे प्रमाण वाढत आहे. पण रोहित्रासाठी ऑइल उपलब्ध नसल्याने रोहित्र दुरुस्ती करुन दिली जात नाही. नवीन रोहित्रची मागणी केली तरी ते दिले जात नाही. त्यामुळे लातूर ग्रामीण मधील शेतक-यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गा-हाणे मांडले.
शेतक-यांची म्हणणे ऐकून घेत माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधले. आम्ही शेतक-यांना दिवसा वीज देऊ, शेतक-यांचे कल्याण करू, असे राज्य सरकार सातत्याने म्हणते. पण प्रत्यक्षात शेतक-यांना रोहित्र उपलब्ध करून दिले जात नाही. ऑईलही नसल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिके जगवायची कशी, पशुधनाला पाणी द्यायचे कसे असे विविध प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केले जात आहे. सरकारने शेतक-यांचे प्रश्न समजून घेऊन मुबलक प्रमाणात ऑइल आणि रोहित्र उपलब्ध करुन द्यावे.
शेतक-यांविषयी सरकारला काळजी उरलेली नाही. रोहित्र नसल्याने शेतक-यांची पिके, भाजीपाला करपून जात आहे. शेतक-यांनी हेलपाटे मारूनही त्यांना रोहित्र मिळत नाही. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई द्या, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या व्यथा आम्ही सरकारपर्यंत पोचवल्या आहेत असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.