नाशिक : प्रतिनिधी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौ-यावर असताना कर्जमाफीविषयी केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद पेटला. विरोधकांनी तर माणिकराव कोकाटे यांचा थेट राजीनामा मागितला आहे. त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी मस्करीमध्ये बोललो. शेतक-यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे कोकाटे म्हणाले आहेत. ते आज नाशिक दौ-यावर होते. त्यांनी शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात. शेतकरी पाच ते दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहतात, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते.
‘‘शेतक-यांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळणार आहे. परंतु शेतक-यांचं यापुढेही कमी नुकसान व्हावं, शेतक-यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच रामजन्मभूमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांसाठी मी प्रभू रामचंद्राकडे समृद्धी आणि सुख मागितले आहे.
त्या दृष्टिकोनातून शेतक-यांसाठी आगामी दिवस हे निश्चितच चांगले असतील, यावर माझा विश्वास आहे,’’ असे कोकाटे यांनी सांगितले.
तसेच, काल अनवधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांचा मान-सन्मान दुखावला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कालदेखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणा-यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रश्न या शेतक-याने केला होता. शेतक-याच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना, कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. तसेच शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, अस्ेही ते म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.