लातूर : प्रतिनिधी
शहरातील गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवारी थाटात पार पडला. कलशारोहण सोहळ्याचे औचित्य साधून भव्य शोभायात्रा, शिवदिक्षा, कीर्तन, महाप्रसाद, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कलशारोहण सोहळा दि. २९ एप्रिल २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
याप्रसंगी श्रीशैलम पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. शांतविरलिंग शिवाचार्य महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह हिरामणअप्पा गवळी, भटू बुद्धाजी नामागवळी, अशोक मंडले, अशोक भाले, देवा अंजीरखाने, नारायण बहिरवाडे, सुरेश शहापूरकर, विजय लकडे, अनिल नायकू, प्रवीण हुंडीवाले, भालचंद्र हुच्चे, रमेश अंबरखाने, विनोद औंढेकर, सदाशिव आलमखाने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नूतन कळसाचे विधिवत पूजन करण्यात आले.
गवळी समाजाचे मन दुधासारखे पांढरे शुभ्र असून ते धार्मिकही असल्याचे नमूद करुन डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, आजचे जीवनमान अतिशय धावपळीचे झाले आहे. प्रवासात असताना एखाद्या मंदिरात प्रत्यक्ष दर्शनासाठी जाणे अशक्य होते, तेव्हा लोक गाडीतूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेताना दिसतात. कळसाच्या दर्शनानेही परमेश्वराच्या दर्शनाची फलप्राप्ती होते.
यावेळी श्रीशैलम पीठाचे जगदगुरु डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन शिवकांत स्वामी गुरुजी व कुमारस्वामी गणाचार्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार झिपरे, मल्लिकार्जुन घुगरे, प्रकाश साठे, दत्ता झिपरे, माणिक आपुने, मन्मथप्पा हुच्चे, राम आपुने, काशिनाथ साठे, यांसह गवळी समाजातील अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले.