मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून जीवनापयोगी आणि त्यातही खाद्य पदार्थांशी संबंधित वस्तूंमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. डाळी, भाज्या, फळे या वस्तूंमध्ये होणा-या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोसळले आहे. त्यातच आता साखरेच्या दरातही मोठी वाढ झाल्याने चहातील गोडवा सुद्धा महागला आहे. साखरेच्या वाढत्या दरामुळे आता मिठाईच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात साखरेसोबतच मिठाईचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता सणासुदीच्या काळात गोड पदार्थ बनवण्यासाठी लागणारी साखरही महाग होत असल्याने याबाबत सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे प्रति क्विंटल दर हे ७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. . साखरेची ही आत्तापर्यंतची इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे साखरेचा भाव वाढल्याने सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा आणि साखरेचा दर पुन्हा एकदा सामान्यपातळीवर येण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तर, मुंबईतही ७० ते ७५ रुपयांदरम्यान साखर विक्री होत आहे.
साखरेच्या दरात झालेली ही मोठी वाढ आता थेट मिठाई व्यवसायाच्या गणितावर परिणाम करू लागली आहे. कारण मिठाई तयार करण्यासाठी साखर हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे साखर महागली आणि मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. देशातील साखर उत्पादनासाठी ऊस हा मुख्य कच्चा माल आहे. काही भागांत हवामानातील बदल, पाऊस किंवा पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होतो. याशिवाय साखरेची मागणी वाढली आणि बाजारातील पुरवठा तुलनेने कमी झाला तर दर वाढण्याची शक्यता असते. ऊस उत्पादक शेतक-यांना द्यावी लागणारी ऊसाची किंमत, कारखान्यांचा उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि इतर खर्च वाढल्यास त्याचाही परिणाम साखरेच्या अंतिम किमतीवर होतो. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीनुसार घाऊक तसेच किरकोळ बाजारातील दर बदलत असतात.















