लातूर : प्रतिनिधी
गेल्यावर्षी १ रूपयात पिक विमा भरण्याची सोय यावर्षापासून बंद करण्यात आली आहे. या वर्षापासूनच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल झाल्यामुळे शेतकरीही पिक विमा भरण्यासाठी फारसे उत्साही दिसत नाहीत. जिल्हयातील ६ लाख ९५ हजार २९६ शेतक-यांनी ४ लाख ४३ हजार २२४ हेक्टरवरील तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचा पिक विमा उतरवला आहे.
लातूर जिल्हयात ३८१.८ मिली मिटर पाऊस झाला असून तो वार्षीक सरासरीच्या ११४.९ टक्के इतका आहे. या पावसाच्या आधारावरच जिल्हयात ५ लाख ६३ हजार ८५० हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या असून पडणा-या पावसाची अनिश्चितता पाहता पिकांना पिक विम्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे. मात्र शासनाने २०२५-२६ या वर्षापासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल केला आहे. पूर्वी १ रूपयात पिक विमा भरण्याची पध्दत या वर्षापासून बंद केली आहे. पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतक-यांना ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक करण्यात आला होता.
खरीप हंगामात पेरणी झालेल्या ४ लाख ४३ हजार २२४ हेक्टरवरील तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कापूस आदी पिकांचा ६ लाख ९५ हजार २९६ शेतक-यांनी पिक विमा उतरवला आहे. यात अहमदपूर तालुक्यातील १ लाख १ हजार ४३४ शेतक-यांनी पिक विमा उतरवला आहे. तसेच औसा ९८ हजार ९८७, चाकूर ६५ हजार २८२, देवणी ४३ हजार २०६, जळकोट ४५ हजार ५३०, लातूर ५६ हजार ८२३, निलंगा १ लाख २३ हजार ६७८, रेणापूर ४३ हजार ४५६, शिरूर अनंतपाळ २९ हजार ५३२, उदगीर ८७ हजार ३६८ शेतक-यांनी पिक विमा भरला आहे.