बारामती : प्रतिनिधी
राज्य शासनाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार यावर्षीच्या सुधारित संचमान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या संच मान्यतेस विरोध केला असून संच मान्यता जुन्या निकषानुसार करण्याची मागणी केलेली आहे.
या धोरणानुसार संच मान्यता शाळा लॉगिनसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. या संचमान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिस-या शिक्षकाच्या मंजुरीसाठी पूर्वीची ६१ पटाची अट ७६ पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळ जवळ बंद झालेला आहे. ६ वी ते ८ वी या वर्गांसाठी २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना ‘०’ शिक्षक मंजूर झाला आहे. यामुळे या वर्गातील मुलांना अन्य गावांत शाळा शोधावी लागणार आहे.
या वर्षीची संचमान्यता प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलिड संख्येवर केली असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. संचमान्यतेतील भाषावार रचनेमुळे बहुतांश समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांना जिल्हाभरात रिक्त जागा नसल्याचे चित्र आहे. २१० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांना पुढील प्रत्येक शिक्षकांसाठी ३० ऐवजी ४० विद्यार्थी संख्येची अट घातलेली आहे.
राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संचमान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून संच मान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षक संघाचा कडाडून विरोध आहे.