लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले डॉ. हमीद चौधरी यांनी लातूर अतिदक्षताच्या माध्यमातून हजारो गंभीर आजारी रूग्णांना जीवदान देण्याचे काम केले. त्यांच्या रूग्णालयाने गेल्या २४ वर्षांपासून सुरू केलेली ही सेवा भविष्यातही अशीच कायम रहावी. राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळत आहेत. लातूर अतिदक्षतामध्येही त्यांनी योजना सुरू करावी, यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे दिली.
लातूर अतिदक्षता रूग्णालयाच्या २४ वा वर्धापन दिन व नवीन अद्ययावत विभागाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे होते. मंचावर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख, डॉ. रमेश भराटे, डॉ. अभय कदम, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, बबन भोसले, अमृता पोहरे, शब्बीर बागवान, लातूर अतिदक्षताचे संचालक डॉ. हमीद चौधरी, डॉ. महेजबीन चौधरी, डॉ. सदफ चौधरी, डॉ. गायत्री सोळंकी, राजश्री पवार, डॉ. फरजाना बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहकारमंत्री पाटील म्हणाले, डॉ. चौधरी यांचा रूग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे कोणत्याही रोगाचे निदान लवकर होते. त्यांनी रूग्णालयात २४ तास ओपीडी, मेडिकल, सोनोग्राफीची सुविधा केली आहे. त्यामुळे कोणत्याही वेळेला येणा-या रूग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत. माजी मंत्री आ.बनसोडे म्हणाले, डॉक्टर हे रूग्णांसाठी देव असतात, त्यावर डॉ. चौधरी हे तत्पर सेवा देतात. प्रारंभी डॉ. हमीद चौधरी यांनी रूग्णालयाचा २४ वर्षांचा आढावा मांडला. डॉ. सदफ चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. मकरंद गिरी यांनी केले. आभार राजश्री पवार यांनी मानले.