हवामान खात्याचा अंदाज, राज्याच्या काही भागांत व्यापला मान्सून
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतरही मान्सूनच्या पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. याबाबत सातत्याने हवामान विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मात्र, आता राज्यात मान्सूनची आगेकूच पाहायला मिळत आहे. ८ जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल झाला असून हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे लवकरच राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती पाहायला मिळत असून तेलंगणाच्या काही भागांमध्येही मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. रत्नागिरीच्या दापोरीजवळी हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण आहे तर ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.
कोकणात पावसाचे आगमन
कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरीमध्येही पावसाचे ढग जमा झाल्याचे चित्र आज सकाळपासूनच बघायला मिळाले. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.
















