सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरून जात होती.
या गाडीतील प्रवासी सोलापूरवरून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. काही नागरिकांनी जोर लावून क्रुझर गाडी सरळ करून त्यामधून मृतदेह बाहेर काढले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये सात ते आठजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याचे समजते. या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. काही नागरिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढून रस्त्यावर ठेवले आणि त्यानंतर गाडी सरळ करून इतर जखमींना बाहेर काढले. सध्या पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. अपघाताच्यावेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून बसवले होते. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू आणि तब्बल ८ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

