रांची : वृत्तसंस्था
स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन सहा जण ठार झाल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना झारखंडमधील गिरिडीहमधील मधुबन पोलिस ठाण्याच्या परिसरातील लट्टाकट्टो इथे घडली. या अपघातात स्कॉर्पिओमधील सोमेश चंद्र, गोपाल कुमार, गुलाब कुमार, तर दुचाकीवरील बबलू कुमार टुडू, हुसैनी मियाँ या मृतकांची ओळख पटली आहे. अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला आहे.
मंगळवारी मध्यरात्री स्कॉर्पिओ आणि दुचाकी विरुद्ध दिशेने येत होते. यावेळी स्कॉर्पिओ चालकाचे प्रकाशामुळे गाडीवरील संतुलन बिघडले. त्याने प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर गाडी झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर गाडी झाडावर आदळल्यानंतर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमधील चार जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच डुमरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुमित कुमार यांनी घटनास्थळावर मधुबन पोलिसांच्या पथकाला पाठवले. पोलिसांनी अपघातग्रस्त नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात जखमी नागरिकांना तपासून मृत घोषित करण्यात आले.
स्कॉर्पिओमधील चार तर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
पोलिस उपविभागीय अधिकारी सुमित कुमार यांनी सांगितले की, ‘माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले. या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये चार जण स्कॉर्पिओमधील तर दोन जण दुचाकीवरील प्रवास करणारे आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.