बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात स्विफ्ट आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे पावसाचा अंदाज न आल्याने कार आणि कंटेनर यांच्यात धडक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघेही मृतक हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ रविवारी (२२ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास स्विफ्ट कारने हे सर्वजण औरंगाबादच्या दिशेने निघाले होते.
पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. हा पाऊस इतका होता की, समोरून येणा-या गाडीचा अंदाजच कारचालकाला आला नाही. पावसामुळे वाहनांचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार आणि कंटेनर यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार थेट कंटेनरच्या खाली शिरली. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसत आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच बर्दापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच जवळच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील सर्व मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.