जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली असून तालुक्यातील हावरगा साठवण तलावावरील तब्बल १०० विद्युत मोटारींचे कनेक्शन जळकोट तालुका प्रशासनाने तोडले आहे. तालुक्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाला होता यामुळे सर्वच साठवण तलाव तुडुंब भरले होते . यामुळे अनेक शेतक-यांनी उसाचीही लागवड केली आहे.
पाऊस काळ चांगला झाला असला तरी व मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला असला तरी तालुक्यातील विविध साठवण तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. यामुळे साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे . पावसाळा येण्यासाठी आणखीन दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे या दोन ते तीन महिन्यांमध्ये तालुक्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून साठवण तलावावरील विद्युत मोटारीचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला शेतक-यांना विद्युत मोटारी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर ज्या शेतक-यांनी आपल्या विद्युत मोटारी सूचना देऊनही बंद केल्या नाही अशा शेतक-यांचे मात्र विद्युत कनेक्शन तहसीलदार राजेश लांडगे यांच्या सूचनेवरून तलाठी नागेश हरणे तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचा-यामार्फत तोडण्यात आले आहेत . जळकोट तालुक्यातील सर्वात मोठा लघु प्रकल्प म्हणून हावरगा येथील साठवण तलाव आहे . या साठवण तलावावर येलदरा, डोमगाव ,जगळपूर , हावरगा या गावातील शेतक-यांच्या विद्युत मोटारी आहेत. जवळपास या साठवण तलावावर शंभर वीज कनेक्शन होते या सर्व विद्युत मोटारींचे करेक्शन दि २४ मार्च रोजी तोडण्यात आले. आता या तलावावर फक्त पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन सुरू आहे.