25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरहेल्मेटविना दुचाकीस्वार सुसाट

हेल्मेटविना दुचाकीस्वार सुसाट

लातूर : विनोद उगिले
राज्य शासनाने हेल्मेट ची सक्ती केली असून चालकांसह मागे बसणा-यानेही हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. असे असताना मात्र लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मोटारसायकलस्वारांनी याला गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यात हेल्मेट सक्ती कागदावरच राहिल्याचे दिसून येते. रस्ते अपघातात दररोज अनेक दुचाकीस्वार बळी जात असताना हेल्मेट वापराबाबत उदासीनता असणे गंभीर बाब आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी का होईना हेल्मेटचा वापर करणे आवश््यक आहे.

परिवहन विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मोटारसायकलीवर मागे बसणा-यानेही हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील बहुतांश मोटारसायकलस्वार व त्यांच्या मागे बसणारे हेल्मेट घालायला तयार नाहीत. एखादा अपवाद वगळता बहुतांश दुचाकीस्वार बिगर हेल्मेट दुचाकी चालवताना दिसून येत आहेत. शासनाच्या या सक्ती नंतर पोलिस प्रशासनाने ही पोलिस कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करत व कारवाईचा बडगा उगारत हेल्मेट सक्तीतून कुणालाही सुट नसल्याचे सुचित केले होते. मात्र आता बहुतांश दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी दामटताना आढळून येत आहेत.

रस्ते अपघातात दरवर्षी हजारो दुचाकीस्वारांचा बळी आहे. त्यामुळे शासनाला त्यासाठी सक्ती करावी लागत आहे. दरम्यान शहरातील रहदारीच्या रस्त्यावर वाहनांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर पेक्षा जास्त ठेवता येत नाही. मग आशा ठिकाणी हेल्मेट सक्ती कशासाठी असा सुरही दुचाकीस्वारांतून निघत आहे. वाहतूक पोलीस शहरातील मुख्य चौकात रहदारीच्या रस्त्यावर तैनात असतात. त्या ठिकाणी दुचाकीस्वारांच्या कागदपत्रांची तपासणी होत असते. याच ठिकाणी हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वारांवर कारवाई होवू शकते मात्र सर्रास तसे होताना दिसून येत नाही. तर कारवाईच्या भितीने अनेक दुचाकीस्वार पोलिसांना टाळण्यासाठी इतर मधल्या मार्गाचा वापर करताना दिसून येतात.

अपघातात दुचाकीस्वार ठार होण्याचे प्रमाण शहरापेक्षा राज्यमार्ग व महामार्गावर अधिक आहे. मात्र त्या ठिकाणी पोलीसांची नजर जाते की नाही हा प्रश्नच आहे. शहरी भागात ज्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते तेथे रहदारीमुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा येत राहते. मात्र इतर मार्गावर दुचाकीचा वेग ताशी ६० ते ७० कि.मी. च्या किंवा याहूनही जास्त असू शकतो. त्यामुळे महामार्गावरील अपघात झाल्यास दुचाकीस्वार हमखास बळी पडतात त्यामुळे जर महामार्गावर जायचे असेल तर मात्र दुचाकीस्वारा जवळ हेल्मेट असणे अत्यावश््यकच आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांनी हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृती व प्रसंगी सक्ती कडक शासन करणेही आवश््यक आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून काहीही साध्य होणार नाही हे मात्र नक्की आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR