लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री विमा योजनेतंर्गत १ रुपयात विमा संरक्षण देण्यात येणार असून यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै, २०२४ पर्यंत आहे. शेतक-यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर आपले विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. विमा सहभाग नोंदवताना आपला मोबाईल क्रमांक इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहिती एसएमएसद्वारे शेतक-यांना दिली जाईल. सीएससी. केंद्र, बँक यांनी शेतक-यांकडून तलाठ्यामार्फत साक्षांकित केलेला सातबारा देण्याचा आग्रह करु नये. सीएसएसी केंद्र चालकांनी विना शुल्क विमा भरुन घ्यावा. कर्जदार शेतक-यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होण्याबाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
इच्छुक शेतक-यांना अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात, एसबीआय. इन्शुरन्स विमा कंपनीमार्फत कार्यरत पीक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत माहिती उपलब्ध करून घेता येईल. तसेच शेतक-यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी या मोबाईल अॅपवर अचूक माहिती नोंदवावी. विमा संरक्षित पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यात तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
कर्जदार शेतक-यांनी विमा शेवटच्या टप्प्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बँकेत, नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा संरक्षण घ्यावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे. संरक्षित क्षेत्रामध्ये पीक बदलाबाबत सूचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापूर्वी २ कार्यालयीन दिवस अगोदर असेल.