मुंबई : प्रतिनिधी
मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा लेखा जोखा त्यांनी मांडला पाहिजे. फक्त बोलायचा भात बोलाची कडी असेच भाजप आणि मोदी सरकारचे धोरण आहे. कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा ते करतात. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी दोन कोटी नोक-या देऊ, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू, स्वामिनाथन आयोग लागू करू, प्रमुख शहरांना स्मार्ट सिटी करून सोबतच प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हेसुद्धा मोदी सरकारने सांगितले पाहिजे.
दरम्यान, भाजपने सर्वांसाठी आपले दारे उघड केली आहे. रोज कुठला तरी नेता किंवा कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात आहे. यात काँग्रेसचाही समावेश आहे. मात्र हे सर्व प्रवेश इच्छेने होत नाही. त्यांना भीती दाखवली जात आहे. काहींना लालच दिले जात असून भाजप ही नेता खाणारी चेटकीण असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सर्वोदयी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी सपकाळ आज नागपूरला आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेली भाजप स्वत: काँग्रेसयुक्त झाली असल्याचा टोला लगावला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. हे बघून काही स्वार्थी लोक सत्तेसाठी त्यांच्याकडे जात आहे. त्याही पेक्षा सत्ताधारी तपास यंत्रणांची भीती दाखवून त्यांना आपल्याकडे खेचून घेत आहेत.
भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे, रामदेव बाबा यांनी आता पेट्रोलचे दर किती कमी झाले, लोकपालांच्या नियुक्तीचे काय झाले याचा जाब सरकारला विचारावा आणि जनतेला उत्तरे द्यावी अशी मागणी सपकाळ यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच सरकारच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा लावली आहे. कोणाला नापास केले जाते तर कोणाला पास. हा सर्व बुद्धीभेद करण्याचा प्रकार आहे. हे सरकार महाराष्ट्राचे वाटोळे करायला निघाले असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.