नागपूर : वृत्तसंस्था
देशात २०३१ पर्यंत आयकर खात्याची आयकरदात्यांकडे १०० लाख कोटी रुपयांची रक्कम थकीत राहील आणि त्यापैकी ६७ टक्के रक्कम बुडीत असेल, अशी धक्कादायक माहिती आहे. आतापर्यंत ४७ लाख कोटी रुपये आयकरदात्यांकडे थकीत असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. दुसरीकडे आर्थिक वर्ष २०२५-२६ चे बजेट ४७ लाख कोटी रुपयांचे आहे, हे विशेष.
हातावर पोट भरणा-या चंद्रशेखर पंडितराव कोहाड या मजुराला आयकर विभागाने एप्रिल महिन्यात ३१४ कोटी रुपयांच्या आयकर वसुलीची नोटीस पाठवली. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवल्याने कोहाड चिंतेत आहेत. यामुळे आयकराच्या थकीत वसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. चंद्रशेखर यांचा पॅन क्रमांक वापरून अन्य व्यक्तीने त्यांच्या खात्यातून व्यवहार केले. या व्यवहाराच्या आधारे ३१४ कोटी रुपयांच्या आयकर वसुलीची नोटीस खात्याने चंद्रशेखर यांना पाठवली. अशा नोटिसा चंद्रशेखर सारख्या हजारो लोकांना खात्याने याआधी पाठविल्या आहेत. त्याआधारे आतापर्यंत ४७ लाख कोटी रुपये आयकर खात्याला देशातील करदात्यांकडून वसूल करायचे आहेत. अधिका-यांची निष्क्रियता आणि अर्थमंत्रालयाच्या फेसलेस प्रक्रियेमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप आयकरतज्ज्ञ सीए कैलास जोगानी यांनी केला आहे.
आयकर अधिका-याने केलेल्या असेसमेंटच्या आधारे आयकर वसुली अधिका-याने चंद्रशेखर कोहाड यांना ३१४ कोटी रुपयांच्या आयकर वसुलीची नोटीस पाठवली असावी. प्रत्येकी ४ ते ५ कोटींपर्यतच्या वसुलीची अशीच काही प्रकरणे माझ्याकडे आहेत. कर वसुली अधिकारी कुठलीही शहानिशा न करता नोटिसा पाठवतात. त्याचा नाहक त्रास चंद्रशेखर कोहाळ यांच्यासारख्या केवळ पॅन क्रमांक असलेल्या करदात्यांना होतो, असे जोगानी म्हणाले.