लातूर : प्रतिनिधी
महावितरणने नोव्हेंबर महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून गेल्या २५ दिवसांत केवळ ६५ टक्केच वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत ५ दिवसांत महावितरणला २० कोटी २ लाख रूपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत बीजबीलांचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करावी लागेल, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या लातूर मंडळासाठी वरिष्ठ कार्यालयाने लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील वीजबील वसुलीसाठी नोव्हेंबर महिन्याचे चालू बिलाचे ५८ कोटी १८ लाख व थकबाकीचे १०१ कोटी ९३ लाख, असे एकत्रीत १६० कोटी ११ लाख रूपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत मागील २५ दिवसात केवळ ३७ कोटी ९८ लाख रूपयांची वीजबील वसुली झालेली आहे. हे प्रमाण खूपच कमी असून येणा-या पाच दिवसात उर्वरीत थकबाकी सोडून चालू महिण्याचे २० कोटी २ लाख रूपयांची वसुली होणे महावितरणसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.
लातूर मंडळा अंतर्गत येणा-या लातूर विभागातील लघुदाब वर्गवारीच्या वीजग्राहकांकडे नोव्हेंबर महिण्याची ३२ कोटी २८ लाख थकीत असून कालपर्यंत २२ कोटी ४ लाख रूपये वसुली झाली आहे. निलंगा विभागातील वीजग्राहकांकडे ९ कोटी ६४ लाख थकीत असून कालपर्यंत ५ कोटी ७८ लाख रूपये वसुली झाली आहे. तर उदगीर विभागातील वीजग्राहकांकडे १६ कोटी २६ लाख थकीत असून कालपर्यंत १० कोटी १६ लाख रूपये वसुली झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण आत्तापर्यंतचे अत्यल्प प्रमाण आहे. थकबाकीदार वीजग्राहकांना एसएमएस द्वारे, प्रत्यक्ष फोन करून तसेच वीजकायद्यान्वये रीतसर नोटीस कालावधी उलटूनही गेला तरीही वीजग्राहक बील भरण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे. वीजबील भरण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपल्ब्ध करून दिले आहेत. या सुविधांचा लाभ घेत वीजग्राहकांना घरबसल्याही बील भरता येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी त्वरीत वीजबीलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

