लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या १०० दिवसाचे कृती कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हा पोलीस दला कडून लातूर जिल्ह्यातील सन २०२० पासून हरवलेले प्रौढ पुरुष व महिला तसेच पळवून नेलेले गुन्हे नोंद झालेले अल्पवयीन मुले व मुली यांची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली असून या शोध मोहिमेत २७६ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर विशेष शोध मोहिमे दरम्यान लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग प्रकरणातील ९२ पुरुष व १४४ महिला असे एकूण २३६ प्रौढ व्यक्ती, तर पळवून नेलेले दाखल गुन्ह्यातील ३५ अल्पवयीन मुली व ५ अल्पवयीन मुले अशी एकूण ४० अल्पवयीन बालके असे एकूण २७६ जणांना शोधण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. सदर शोध मोहिमेत स्थानिक पोलीस स्टेशनचे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांचे पथकांकडून शोध मोहिमे दरम्यान राज्यात तसेच परराज्यात विविध ठिकाणी पथके पाठवून शोध घेण्यात आला आहे.
सदरची विशेष शोध मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक, सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांचेकडून यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. पोलीस दलातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा शोध घेण्यात यश आल्याने समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.