नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
माहूर : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या २ सख्ख्या जावांची गळा आवळून हत्या करण्यात आली. शिवाय हत्येनंतर त्या दोघींच्या अंगावरचे दागिनेही काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
अंतकलाबाई अशोक आढागळे (५५) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (४५) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे माहूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोंदा शिवार हा डोंगराळ भाग असून माहूर शहरापासून ३५ किलो मीटर दूर आहे. अंतकलाबाई आढागळे आणि अनुसयाबाई आढागळे या याच गावातील रहिवासी आहेत. नात्याने या दोघी सख्ख्या जावा आहेत. नेहमी प्रमाणे दोघी कापूस वेचण्यासाठी आजही शेताकडे गेल्या होत्या. स्वत:च्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना अज्ञाताने दोघींची गळा आवळून हत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ््यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा आहे.

