लातूर : प्रतिनिधी
या वर्षी जिल्हयात मान्सून पावसाच्या पूर्वीच अवकाळी पावसाने धडाका सुरू केला आहे. तसेच आता मान्सून पूर्व पावसानेही हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी चांगला पाऊस यावर्षी होईल अशा अपेक्षा शेतक-यांना आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांना लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी व पुढील पिकांच्या वाढीसाठी जिल्हयातील २२ बँकांच्याकडून गेल्या दोन महिण्यात जिल्हयातील ३७ हजार ३९९ शेतक-यांना ४१५ कोटी ४० लाख ११ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्हयात यावर्षी ५ लाख ९३ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ८२ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ७३ हजार ८२० हेक्टर क्षेत्रावर तुर, ७ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर मुग, ५ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उडीद, ३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, २१५ हेक्टरवर बाजरी, २ हजार हेक्टर ५११ क्षेत्रावर मका, ४३ हेक्टरवर साळ, १९७ हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, १७५ हेक्टर क्षेत्रावर तीळ, १६ हेक्टरवर सुर्यफूल, ३४१ हेक्टरवर इतर पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे.
तसेच १६ हजार २९५ हेक्टर क्षेत्रावर कापूसाची लागवड पेरणी होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी शेतक-यांनी सावकाराकडे हात पसरू नयेत म्हणून शासनाने बँकांना २ हजार ४५८ कोटी ४ लाख २१ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. सदर पीक कर्ज वाटप प्रक्रीया दि. १ एप्रिल पासून सुरू झाली आहे. ती सप्टेंबर अखेर पर्यंत चालणार आहे. या खरीप हंगामात शेतक-यांना मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्याच्या सुचना आहेत. जिल्हयातील २२ बँकांनी गेल्या दोन महिण्यात ३७ हजार ३९९ शेतक-यांना ४१५ कोटी ४० लाख ११ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप पिक निहाय मागणी नुसार करण्यात आले आहे.