चंद्रपूर : निर्भय बनो या माध्यमातून अँड असीम सरोदे यांच्यासह इतर मंडळींनी चंद्रपूर इथे सभा घेतली. त्या सभेत सरोदेंनी शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत येणार असल्याचा दावा केला. या सभेत सरोदेंनी थेट या १२ जणांच्या नावाची यादीच वाचून दाखवली. परंतु यातील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दिसून येते. त्यातील एका आमदाराचे नाव सरोदेंनी भलतेच घेतले.
असीम सरोदे यांनी चंद्रपूरच्या सभेत म्हटले की, शिंदेकडे गेलेले १२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात पालघरचे श्रीनिवास वनगा, चोपड्याच्या लता सोनवणे, अलिबागचे महेंद्र दळवी, मागाठणेचे प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिमणराव पाटील, बाळापूरचे नितीनकुमार तळे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, कन्नडचे उदयसिंह राजपूत, कोरेगावचे महेश शिंदे, राधानगरीचे प्रकाश आबिटकर ही नावे सांगितली. हे १२ जण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शरण येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आले आहे. आपले या माणसासोबत भविष्य नाही. ज्याला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
परंतु असीम सरोदेंनी भाषणात ११ आमदारांची नावे घेत १२ जण पुन्हा ठाकरेंकडे परतणार असा दावा केला. या वाचून दाखवलेल्या आमदारांच्या यादीतील २ आमदार हे आधीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे निदर्शनास येते. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंकडेच आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, मला ५० कोटींहून अधिक ऑफर होती. माझ्या घरी गाडीतून पैसेही आले होते, माझ्याकडे त्याचे सीसीटीव्ही आहेत. पैशाने विकला जाणारा मी गद्दार नाही. माझ्या मुलांना मी काय तोंड दाखवले असते अशी टीका शिंदे गटावर केली होती.
तर दुसरे बाळापूरचे आमदार नितीनकुमार तळे असे सरोदेंनी नाव वाचले, ते नितीनकुमार तळे हे नितीन देशमुख नावाने प्रसिद्ध आहेत. जे शिवसेना फुटीवेळी शिंदे गटासोबत सूरत गुवाहाटीला गेले होते. मात्र त्यांना फसवून नेण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता. नितीन देशमुख हे फुटीपासूनच उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मात्र सरोदेंनी या आमदाराचे नावही त्याच यादीत जोडले.