21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रवनराज आंदेकर खून प्रकरणात १३ जणांना अटक

वनराज आंदेकर खून प्रकरणात १३ जणांना अटक

पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणा-या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. मात्र, पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरांच्या बहि­णींना पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर, आज सायंकाळी ताम्हिणी घाटातून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणात गंभीरतेने लक्ष घालून पुण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोमाने प्रयत्न केल्याचे दिसून येते.

दरम्यान, आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षांत राजकारणात सक्रिय झाले. मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. त्यामुळे वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. पुण्यातील नाना पेठेत १४ ते १५ हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी, थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला त्यातच वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरगुती संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी तपासातून समोर आले आहे.

सोमनाथ गायकवाड कनेक्शन?
आंदेकरांच्या हत्येला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमीसोबतच आता सोमनाथ गायकवाडशी संबध जोडला जात आहे. सोमनाथ गायकवाड हा कारागृहातून एप्रिल २०२४ मध्ये जामिनावर बाहेर आला. आंदेकर टोळीत आणि त्याच्यामध्ये धुसफूस सुरू होती. सोमनाथ गायकवाडला भीती होती की, आंदेकर टोळी आपला गेम करणार. त्यामुळे आपल्याला जिवंत राहायचे आहे, तर आंदेकर टोळीचा मुख्याला ठोकला पाहिजे, असे त्याने ठरवले. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्याने याबाबत आखणी करण्यास सुरुवात केली. अखेर रविवारी रात्री संधी मिळताच सोमनाथच्या पंटरांनी वनराज आंदेकरांचा गेम केला. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. मात्र या गुन्हेगारीपासून लांब अशी वनराज आंदेकरांची ओळख आहे. वनराज आंदेकर राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. राष्ट्रवादी पक्षाकडून ते नगरसेवकदेखील झाले होते. मात्र पूर्ववैमन्स, कौटुंबिक कलह, संपत्तीवरून वनराज यांच्या खुनाचे प्राथमिक कारण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR