नवी दिल्ली : दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनंतर भाजपचे सरकार आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आम आदमी पार्टीच्या गडाला सुरूंग लावला आहे. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे आपला मात्र मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान आता दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आल्याने अनेक गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये पूर्वीच्या सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यामध्ये देखील आता बदल केला जाण्याची शक्यता आहे. आपने दिल्लीतील महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरू केली होती, या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये दिले जात होते.
मात्र आता दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी दिल्लीमध्ये भाजप नवी योजना सुरू करण्याची शक्यता आहे. नव्या योजनेंतर्गत दिल्लीतील महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये नाही तर अडीच हजार रुपये मिळणार आहेत. भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळीच या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार आल्याने नवी योजना कधीपासून सुरू होणार? त्यासाठी अर्ज कसा करायचा याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
नव्या योजनेंतर्गत दिल्लीतील महिलांना एक हजार नाही तर अडीच हजार रुपये मिळणार आहेत. पुढच्या महिन्यात मार्चपासून ही नवी योजना सुरू होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते की अंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी दिल्लीतील महिलांच्या खात्यात दर महिन्याला अडीच हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, येत्या मार्चपासून दिल्लीतील महिलांच्या खात्यात दर महिन्याला अडीच हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये भाजप सत्तेत आले आहे, मात्र अजून नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. शपथविधीनंतरच या योजनेबाबतचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र मार्चपासून महिलांना अडीच हजार रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.