गडचिरोली : प्रतिनिधी
छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज सकाळी ७ च्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ््या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दंतेवाडा सीमेजवळील विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज कारवाई सुरू करण्यात आली.
छत्तीसगड पोलिसांना बिजापूर-दंतेवाडा (बस्तर) जिल्ह्याच्या सीमा भागातील गंगलूर जंगल पारिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. यावरून जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात २६ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.
दुसरी चकमक कांकेर-नारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे.
बस्तर रेंजचे आयजीपी सुंदरराज पी यांनी सांगितले की, दंतेवाडाच्या सीमेजवळ बिजापूर जिल्हातील गंगालूर ठाण्याअंतर्गत येणा-या जंगल परिसरात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाच्या शोध मोहिमदरम्यान सकाळी ७ वाजता चकमक सुरू झाली. अनेक तास अधूनमधून गोळीबार सुरू होता. गोळीबारात विजापूर जिल्हा रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान शहीद झाला.
वर्षभरात १०५ नक्षली ठार
या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये सुमारे १०५ नक्षलवादी मारले गेले. ज्यामध्ये बस्तर भागातील ६९ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तसेच या मोहिमांदरम्यान एकूण १३ जवान आणि १६ नागरिकांचाही मृत्यू झाला.