मैदुगुरी : नायजेरियातील एका कॅथोलिक शाळेतून ३०० हून अधिक मुलांसह कर्मचा-यांचे अपहरण करण्यात आले आहे. सुरुवातीला ही संख्या २२७ इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र आता हे देशातील आजवरचे सर्वात मोठे सामूहिक अपहरण असल्याचे म्हटले जात असल्याचे वृत्त आहे.
ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने या घटनेची माहिती देताना सांगितले की, राज्यातील सेंट मेरी स्कूलमधून अपहरण केलेल्यांचा अंदाज २२७ वरून ३१५ पर्यंत वाढवला आहे. आता ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचा समावेश आहे, ज्यामुळे अपहरण झालेल्यांची एकूण संख्या ३१५ झाली आहे. दरम्यान, नायजेरियामध्ये सशस्त्र गट आणि इस्लामी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना अपहरणाच्या घटनेने खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिश्चनांवर केलेल्या वागणुकीवरून लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर हे सामूहिक अपहरणाचा प्रकार घडला आहे.
शाळेतून अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची नेमकी संख्या नायजेरियन सरकारने अद्याप भाष्य केलेले नाही. तथापि, नायजर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद उमर बागो यांनी शनिवारी सांगितले की गुप्तचर विभाग आणि पोलिस सखोल तपास करत आहे. राज्यपाल बागो यांनी तात्काळ नायजर राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जवळच्या राज्यांनीही अशाच प्रकारची खबरदारी घेतली आहे. राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील ४७ बोर्डिंग माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी देशांतर्गत सुरक्षा परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जोहान्सबर्गमधील जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या त्यांच्या योजनांसह त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
वाढती सुरक्षा भीती आणि आंतरराष्ट्रीय दबाव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियातील कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी ख्रिश्चनांच्या हत्येबद्दल लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर हा प्रकार घडला आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी नायजेरियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नुहू रिबाडू यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान अबुजा येथे “ख्रिश्चनांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी तातडीने आणि कायमस्वरूपी कारवाई करावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
खंडणी मागणा-या टोळ्यांकडून ग्रामीण भाग लक्ष्य
मंगळवारी पश्चिम नायजेरियातील एका चर्चवर झालेल्या वेगळ्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. बंदूकधा-यांनी डझनभर काहींचे अपहरण केल्याचे मानले जाते. अलीकडील हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही परंतु खंडणी मागणा-या या टोळ्या ग्रामीण भागातील शाळांना लक्ष्य करत आहेत.

