पैठण : पैठण शहरातील रंगारहाटी परिसरातील मठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणा-या दोन बालवारक-यांचा गुरुवार दि. २० मार्च रोजी गोदावरी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मठातील चार बालवारकरी दुपारी स्रानासाठी गोदा पात्रात गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. प्रसंगावधान साधून इतर वारक-यांनी दोघांना वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत चैत्यन्य अंकुश बदर (१३) आणि भोलेनाथ कैलास पवळे (१०) या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंकुश(रा. वालसा खालसा तालुका भोकरदन जि. जालना) याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरा बालवारकरी भोलेनाथ कैलास पवळे (रा . चितेगाव पैठण) याचा शोध घेतल्या जात आहे.
अंधारामुळे शोध मोहीम थांबवली असून कैलासचा मृतदेह उद्या सकाळी काढला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ बुरकुल हे करत आहेत.