22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये ४८ तासांत उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये ४८ तासांत उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू

नागपूर : विदर्भात नवतपाच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत म्हणजे ४८ तासांत सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.  बुधवारी नागपुरात ४५.२ अंश सेल्सिअस अशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. या आठवड्यात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४६.७ नोंदवण्यात आले. बुलडाणा (३८.२) वगळता विदर्भात इतर जिल्ह्यांतील तापमान हे ४० ते ४५ अंशांवर धडकले आहे.

बुधवारी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी उड्डाणपुलाखाली एक ३० वर्षीय युवक बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरी घटना अजनी हद्दीतील शताब्दी चौकात पुढे आली.

४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. सकाळी दहाच्या सुमारात धंतोलीतील जनता चौकातील मेहाडिया भवनजवळ ५० वर्षीय इसम बेशुद्धावस्थेत आढळला. याशिवाय कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कळमना बाजारात ५० वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्याला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदरमधील इस्तंबूल हॉटेलसमोर ६५ वर्षे वयाचा ज्येष्ठ नागरिक मृत अवस्थेत आढळला. तर पाचपावलीतील यशोदीप कॉलनी भागात ५० वर्षे वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मेयोमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केले. अद्याप या सहाही मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR