गडचिरोली : नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी व नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळेच, गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:हून आपल्याकडे घेतले आहे. त्यानंतर, गडचिरोली व चंद्रपूर या भागातील काही नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केल्याचे आपण पाहिले होते.
आता, महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या तेलंगणातील कोठागुडेम जिल्ह्यातील तब्बल ६४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आपलं शस्त्र खाली ठेवलं आहे. येथील पोलिस मुख्यालयात ऑपरेशन कार्यक्रमाचा भाग म्हणून मल्टी झोन-१ चे आयजीपी चंद्रशेखर रेड्डी यांच्यासमोर ६४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. विजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील वेगवेगळ्या बटालियनमधील नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने पोलीस व सरकारेच हे मोठे यश मानले जात आहेत.
माओवादी पक्षाच्या नावाखाली, आदिवासी भागांचा विकास आणि गेल्या तीन महिन्यांत १२२ नक्षल सदस्यांचे आत्मसमर्पण करण्यात सरकारला यश आले आहे. नक्षलवादी संघटनांच्या डीव्हीसीएम, एसीएम, मिलिशिया सदस्य, पक्ष सदस्य, पीपीसीएमचे हे सर्वजण सदस्य होते. आज आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये १६ महिलांचा देखील समावेश आहे. १६ महिलांसह एकूण ६४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाकडून प्रत्येकी २५,००० रुपये रोख रक्कम देण्यात आली. दरम्यान, २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवून टाकण्यात येईल, असा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता. त्यामुळे, ६४ नलक्षवाद्यांचे आत्मसमर्पण हे त्याच दिशेने पडलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी झाले होते. तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता.
काय म्हणाले होते अमित शाह
नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. आज आपण मानवता विरोधी नक्षलवाद संपवताना आपले दोन शूर सैनिक गमावले आहेत. हा देश या वीरांचा सदैव ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. दरम्यान, ३१ मार्च २०२६ पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असा माझा संकल्प असल्याचे अमित शाहांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.