रायपूर : छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षा दले अणि नक्षलवादी यांच्यात पुन्हा एकदा चकमक झाली. नारायणपूर, बिजापूर आणि दांतेवाडा सीमेवरील नक्षलग्रस्त भागात जवानांनी ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरुन आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत असे सांगितले जात आहे की, गुरुवारी तीन जिल्ह्यांतील १००० जवान सर्च ऑपरेशन करत होते. यादरम्यान नक्षलवादी आणि जवानांमध्ये वेगवेगळ्या भागात चकमक सुरु झाली. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरु आहे. दांतेवाडा येथील पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. सर्च ऑपरेशन सुरु असताना जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून कारवाई सुरु आहे.