23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रबेकायदा बांधकाम हटविण्यासाठी समितीला ८ दिवसांची मुदत

बेकायदा बांधकाम हटविण्यासाठी समितीला ८ दिवसांची मुदत

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणा-या महाराष्ट्रातील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीएमसी कर्मचा-यांनी बेकायदेशीरपणे मशीद पाडल्याच्या आरोपावरून येथे वाद निर्माण झाला. या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बीएमसीची टीम तेथून रवाना झाली आहे.

या प्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकाम हटविण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. धारावीचे रहिवासी समरुद्दीन शेख म्हणाले, मी धारावीत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, ज्या इमारतीला बीएमसी आणि इतर अधिकारी बेकायदेशीर म्हणत आहेत, ती एका दिवसात बांधली गेली नव्हती. बांधायला अनेक दिवस आणि महिने लागले, मग अधिकारी कुठे होते? आज ते संरचनेला मशिदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आता ते मशीद पाडणार असल्याचे सांगत आहेत.

मुंबईतील धारावी येथील मेहबूब सुभानी मशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ही मशीद खूप जुनी असल्याचे येथील लोक सांगतात. अशा स्थितीत मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR