23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगोलीसह ८ मेडिकल कॉलेजचा बुधवारी शुभारंभ

हिंगोलीसह ८ मेडिकल कॉलेजचा बुधवारी शुभारंभ

हिंगोलीसह ८ मेडिकल कॉलेजचा बुधवारी शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आणखी आठ वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार असून, या महाविद्यालयाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दुपारी दीड वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना आमंत्रित करण्याचे आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि संबंधित आठही जिल्हाधिका-यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात आणखी ८ वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असून, हिंगोलीचाही यात समावेश आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिस-या फेरीत जागांचा वाढीव कोटा उपलब्ध होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी नव्या ८ महाविद्यालयाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार असल्याचे सांगितले. राज्यात नवीन ८ महाविद्यालये सुरू झाल्यास राज्यातील ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या (जीएमसी) तिस-या फेरीत केंद्रीय कोट्यातील १५ टक्के जागा (सीट मॅट्रीक्स) वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिस-या फेरीत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार आता बुलडाणा, अंबरनाथ, हिंगोली, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, जालना येथे शासकीय महाविद्यालये सुरू होणार असून, समुपदेशासाठी सहभागी विद्यार्थ्यांना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी पसंती नोंदवून तिस-या फेरीत निवड झाल्यास प्रवेशित होता येणार आहे.

राज्यात नवे ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर राज्य शासनाने २८ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले होते. या महाविद्यालयांसाठी आवश्यक रुग्णालये, महाविद्यालय इमारती, वैद्यकीय शिक्षक, सहायक मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पहिल्या फेरीत परवानगी नाकारली. त्यानंतर त्रुटीची पूर्तता करून दुसरे अपिल करण्यात आले. त्यावर केंद्रीय कुटुंब कल्याण महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी लेटर ऑफ परमिशन द्यायला सांगितले. तोपर्यंत दुस-या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय (डीएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण विभाग (एमईडी), महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी एनएमसीकडे धाव घेत प्रक्रिया पूर्ण करायला सुरुवात केली आहे. एलओपी मिळाली, त्यासंबंधी राज्य शासनाच्या निर्णयाचा आदेशही पारित झाला आहे. आता आरोग्य विभागाकडून संलग्नता प्रमाणपत्र मागण्यात आले. ही प्रक्रिया बुधवारपर्यंत पूर्ण होणार असून, तिस-या फेरीत या दोन्ही कोट्यातील ८०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

एनएमसीने पहिल्या फेरीत नाकारली होती परवानगी
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) पहिल्या फेरीत परवानगी नाकारली. त्यानंतर त्रुटींची पुर्तता करून दुसरे अपिल करण्यात आले. त्यावर केंद्रीय कुटुंब कल्याण महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी लेटर ऑफ परमिशन (एलओपी) द्यायला सांगितले. तो पर्यंत दुस-या फेरीची प्रक्रिया सुरू झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR