मुंबई : महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पण, राज्यातील सर्वाधिक बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून झाल्याची माहिती समोर आली.
राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्याबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. पण, महिलांवर जे अत्याचार झाले आहेत, त्यात सर्वाधिक अत्याचार ओळखीच्या व्यक्तींकडून झाले आहेत. अनोळखी व्यक्तींकडून झालेल्या घटनांचे प्रमाण हे ०.४२ टक्के इतके आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना महिलांवरील वाढत्या बलात्कारासंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, काही गोष्टींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे, तर विनयभंग आणि बलात्कार. सातत्याने आपण बघितलं तर २०१३ साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण या गुन्ह्यांची व्याख्या बदलली. त्याला अद्ययावत केले. पूर्वी आपण ज्या गोष्टी विनयभंगाच्या व्याख्येत समजायचो, त्याला आता बलात्काराच्या कक्षेत पकडतो. २०१३ साली दुरुस्ती केली आणि त्यावेळी भारतीय दंड विधानामध्येही सुधारणा करण्यात आली. त्यात पूर्वी ज्या घटनांसाठी विनयभंगाचे कलम लावायचो, त्यांना २०१३ नंतर बलात्काराचे कलम लावतो.
२०१३ पासून बघितले तर एकही वर्ष असे नाही, ज्यात वाढ झाली नाहीये. दरवर्षी या गुन्ह्यात वाढ आहे, पण ही जी वाढ आहे. ही वाढ एक प्रकारे चिंताजनक असली, तर दुस-या प्रकारे समाधानकारक आहे. कारण यापूर्वी समाजामध्ये या घटनांची नोंद करणे हे एक वाईट मानले जायचे. समाजाचा दबाव असायचा. समाजाच्या दबावामुळे अनेकवेळा घटना दाखल व्हायच्या नाही, असे फडणवीस म्हणाले.
आपण जर महिलांवरील अत्याचाराच्या संज्ञेमध्ये बघितले, तर बलात्कारामध्ये आरोपींचे जे वर्गीकरण आहे. याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचे वर्गीकरण किती? तर २०२१ साली ते ९८.७७ टक्के होते. २०२२ साली ते ९९ टक्के होते. २०२३ साली ते ९९.४० टक्के होते आणि २०२४ मध्ये ९९.५८ टक्के आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.
महिला बोलू लागल्यात
म्हणजे फक्त ०.४२ टक्के बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना या अनोळखी व्यक्तींनी केलेल्या आहेत. ९९.५८ टक्के हे ओळखीच्या व्यक्तींकडून झालेले बलात्कार आहे. जरी या घटनांची नोंदणी वाढत असली, तरी समाजात आता महिला बोलू लागल्या आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आरोपपत्र दाखल करण्याचा वेग वाढला
तुम्ही तक्रार करू नका. लग्न होणार नाही. समाज काय म्हणेल, यापलिकडे चाललेले आहे आणि त्यामुळे ही समाधानाची बाब आहे. महत्त्वाचे हे आहे की, मोठ्या प्रमाणात आरोपपत्रात वेगाने दाखल करतो आहोत. ६० दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचा वेग ९० टक्के आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.