नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. काल भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यामुळे दिल्लीत हालचालींना वेग आला आहे, या बैठकीआधी पीएम मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हेही बैठकीला पोहोचले. बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. बैठक सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मोदी सरकार दहशतवादावर मोठा हल्ला करणार असल्याचे मानले जात आहे.
दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे आवश्यक
मोदी सरकार आणि लष्कर पुन्हा हवाई हल्ले करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या हवाई हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्य इतर ठिकाणीही हल्ला करू शकते. काश्मीरमधून दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी, पाकिस्तानच्या सीमेभोवती असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे आवश्यक आहे.
सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, एस. जयशंकर, जे. पी. नड्डा आणि निर्मला सीतारमण यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसकडून सुदीप बंदोपाध्याय आणि द्रमुककडून टी. आर. बालू हे प्रमुख विरोधी नेते बैठकीला उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. इतर विरोधी नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, शिवसेनेचे ( ठाकरे गटाचे) संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, बीजेडीचे सस्मित पात्रा आणि सीपीआय(एम) चे जॉन ब्रिटास यांचा समावेश होता.