नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या इराण आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र भारत दौ-यावर आले आहेत. सौदीचे मंत्री अदेल अलजुबैर यांनी गुरुवार दि. ८ मे रोजी देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यावर भर देण्यात आला.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील आधीच ताणलेले संबंध आणखी बिकट झाले असताना अलजुबैर भार दौ-यावर आले आहेत. या भेटीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की आज सकाळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र अदेल अलजुबैर यांच्याशी भेट झाली. यादरम्यान दहशतवादाशी लढण्याबाबत चर्चा झाली.
दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हेदेखील काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वनियोजित भारत दौ-यावर आले आहेत. जयशंकर यांनी अब्बास अरघची यांना थेट सांगितले की आमचा हेतू परिस्थिती बिघडवण्याचा नाही, परंतु जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला, तर भारत पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल यात शंका नाही. अरघगी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.
दहशतवाद्यांच्या ९ छावण्या उद्ध्वस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद(जेईएम) दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूर आणि लष्कर-ए-तोयबाचा अड्डा असलेल्या मुरीदकेचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.